यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे
राज्यसरकारने नुकतीच किराणा दुकानात वाईन विकण्यास परवानगी दिली आहे,मात्र ह्या अवसानघातकी तुघलकी निर्णयाने अनेक परिवार उघड्यावर येतील ,विद्यार्थ्यांच्या भविष्यावर भयंकर दुष्परिणाम होतील , ह्या सर्व बाबींचा कोणताही विचार न करता केवळ महसूल मिळवण्याच्या नादात केंद्र सरकार इथे खुलेआम मरणाला विकण्याचीच परवानगी देत असून ,हा तद्दन अविवेकी विचार सरकारने ताबडतोब रहित करावा , अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात संवैधानिक आंदोलन छेडावे लागेल असा गर्भित इशारा भीम आर्मी संविधान रक्षक दल महाराष्ट्र राज्याचे सचिव व उत्तर महाराष्ट्राचे प्रचार प्रसिद्धी प्रमुख सुपडू संदानशिव यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे.
राज्यसचिव सुपडू संदानशिव यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले की ,अगोदरच खेडोपाडी,ग्रामीण भागात अनेक परिवारांचे दारूच्या व्यसनामुळे कुटुंब उध्वस्त झाले आहेत,आज सुद्धा दारूच्या आहारी जावून अनेकांचे कौटुंबीक वाद आपण रस्त्यावरती होतांना दिसतात, ग्रामीण क्षेत्रात संध्याकाळी सहा वाजेच्या नंतर गावात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांची संख्या मोठी आहे . असे असतांना त्यात भर म्हणून की काय , राज्य शासनाने किराणा दुकानात वाईन विकण्यास परवानगी दिल्याने भर पडली आहे,त्यामुळे ग्रामीण भागात,गरिबांच्या घरी दुःखाचा स्फोट होण्यास कोणी अडवू शकत नाही. त्याच बरोबर ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांनी ही जागरूक होणे गरजेचे आहे,जर किराणा दुकानात वाईन सहज उपलब्ध झाली तर मुलांवर याचा काय दुष्परिणाम होईल याचा सारासार विचार करून ह्यावर आज आवाज उठवला नाही तर येणाऱ्या काळात दारूपीडित परिवाराचे व पाल्यांचे भविष्य उध्वस्त होईल,म्हणून राज्य सरकारने हा तुघलकी निर्णय तत्काळ मागे घ्यावा , असा निर्वाणीचा इशारा भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे राज्य सचिव सुपडू संदानशिव यांनी दिला आहे.