प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट : शहरातील कलोडे चौक परिसरात सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या बांधकामादरम्यान आज शनिवारी (२4 मे) सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला.
कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एकाचा पाय तुटून वेगळा झाल्याची धक्कादायक घटना घडली.
या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून उड्डाण पुलाच्या कामादरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांवर नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
जखमींमध्ये विजय उत्तम सादा (वय २६), व्यवसाय – हमाली, रा. बिहार तसेच लल्लन सिहाहारण यादव (वय ४५), व्यवसाय – ठेकेदार, रा. बिहार यांचा समावेश आहे. दोघेही साई कृपा दालमिल परिसरात काम करीत असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे कलोडे चौक परिसरातील रस्ता अत्यंत अरुंद झाला असून वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत आहे. सकाळच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी कंटेनरखाली ओढली गेल्याने दोघांचेही पाय गंभीररीत्या चिरडले गेले. अपघात इतका भीषण होता की, एका जखमीचा पाय पूर्णपणे तुटून वेगळा झाल्याची माहिती समोर आली आहे.breakingnews
अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमी अवस्थेतील दोघांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.hingnghatnews
दरम्यान, उड्डाण पुलाच्या बांधकामादरम्यान योग्य वाहतूक नियोजन, इशारा फलक, सुरक्षा बॅरिकेड्स व वाहतूक नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बांधकाम सुरू असताना जड वाहनांची वाहतूक नियंत्रणाशिवाय सुरू असल्याने मोठा धोका निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.wardhanews
शहरात मोठ्या प्रमाणावर बाहेर राज्यातील हमाल व मजूर कामासाठी आलेले आहेत. मात्र अशा गंभीर दुर्घटनांमध्ये त्यांच्या वैद्यकीय मदतीपासून अपघात भरपाईपर्यंतच्या हक्कांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. जखमी कामगारांना शासन नियमांनुसार आर्थिक मदत, उपचार खर्च व योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Accident news /या घटनेनंतर प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, कामगार विभाग आणि संबंधित कंत्राटदार यांची जबाबदारी निश्चित करून उड्डाण पुलाच्या कामादरम्यान कडक सुरक्षा उपाययोजना राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.



