सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट – तरूणाई बिघडली, वाईट मार्गाने लागली, सामाजीक भान हरवलेली तरूण मंडळी अशा गोष्टी नेहमीच ऐकायला आणि अनूभवायला मिळते. परंतु विश्व कल्याणासाठी वयाच्या तिशीत ४२०० कि.मी चा पायदळ प्रवास करून पर्यावरण वाचवा असा संदेश देण्याकरिता निघालेल्या अवधेशकडे बघितल्यावर आम्हा तरूणांमधे नवी उमेद जागृत होते.
काल दुपारी १:०० च्या सुमारास स्नेहल नर्सरीत काही रोपं घ्यायला गेलो असता खांडरे सर, गुड्डू भाऊ आणि गोलू भाऊंसोबत एक व्यक्ति चर्चा करत दिसली. त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती घेतली तेव्हा त्या व्यक्तिची पर्यावरण रक्षणाबाबत असलेली कळकळ समजली.
मुळचा मथुरेचा राहणारा अवधेश शर्मा याने भारताच उत्तरेकडील टोक असलेल्या लद्दाख मधील थांग या गावापासुन भारताच दुसरं टोक म्हणजेच कन्याकुमारीपर्यंत एकूण ४२०० कि.मी चा पायदळ प्रवास करण्याच ठरवलेलं आहे. यामागचा त्याचा उद्देश विचारला असता त्याने RGB म्हणजेच
Red Donate Blood,
Greeen.
* Save Environment,
Blue .Save Water.
हे असल्याच सांगितल. या तरूणाचा हा पहिलाच प्रवास नसून याआधी संपुर्ण उत्तराखंड प्रदेश सायकलने पालथा घातला. तर सियाचीन सारखा (उने)-३०° चा अतिथंड भूभाग पायदळ सर केला. RGB मोहीम सुरू असताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. ज्यामधे अटल टनल हे ९ कि.मी चे अंतर पार करत त्याने आपल्या दृढ निश्चयाचा परिचय दिला.
खांडरे सरांनी ४२०० झाडं देऊन अवदेशची स्वप्नपूर्ती केली .
३५ किलो वजनाची बँग घेऊन प्रवासाला निघालेला हा तरूण काल त्याच्या ६६ व्या दिवसाच्या प्रवासात श्री. दिगांबरजी खांडरे यांच्या स्नेहल किसान नर्सरीत पोहोचला. तिथे जाण्याचा उद्देश म्हणजे आपला जेवढया किलोमीटरचा प्रवास होईल तेवढी झाडं प्रवास संपल्यावर आपल्या मूळ गावी मथुरेला लावण्याचा संकल्प त्याने केलेला होता. त्यामुळे प्रवासादरम्यान जिथे कुठे नर्सरी दिसली तिथुन काही झाडं उपलब्ध होईल का? या अपेक्षेने जात होता. परंतु खांडरे सरांची भेट झाली आणि ४२०० झाडांच्या लागवडीचे उद्दीष्ट चुटकीसरशी पुर्णत्वास आले. खांडरे सरांनी सगळीच रोप विनामूल्य देण्याचे कबुल केले. सरांनी आजवर लाखो झाडं देणगी स्वरूपात दिली त्यात ही आणखी भर म्हणता येईल. रोज ४० ते ५० कि. मी चा प्रवास करताना राहण्याची व्यवस्था हा अडचणीचा विषय ठरतो. परंतु आपल्या नर्सरीत जेवणाची व्यवस्था आणि पुढील मुक्कामाची पांढरकवडा येथे व्यवस्था श्री. खांडरे सरांनी केली.
विश्व कल्याणाचा ध्यास उरी बाळगून ४२०० कि. मी च्या अवघड प्रवासाला निघालेल्या एका अवलीयाला या प्रवासात एक असाच अवलीया श्री. खांडरे सरांच्या रूपाने मिळाला. पर्यावरण रक्षणाचा संदेश घेऊन आयुष्याच्या ऐन उमेदीचा काळ खर्ची घालणाऱ्या या तरुणाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आम्ही हजारो कि.मी पायी चालू शकणार नसू. परंतु दोन पावलं समोर टाकून झाडं लावू शकतो. पावसात विनाकारण वाहणारं पाणी वाचवु शकतो. लाख मोलाचा जीव रक्तदान करून वाचवू शकतो. आणि अवधेश सारख्या तरूणाच्या पायपिटीला न्याय देऊ शकतो.
अवधेशचा १५ ऑगस्टला स्वातंत्र दिनादिवशी कन्याकुमारी पोहोचण्याचा ध्यास आहे. त्यासाठी आपल्या शुभेच्छा त्याच्या पाठिशी असू द्या.