जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश पारीत; पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये • सोशल डिस्टसिंग व मास्कचा वापर बंधनकारक • जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी स्वत: केली कारवाई

0
373

 

लग्न समारंभासाठी 50
व्यक्तींनाच परवानगी

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

बुलडाणा:-दि. 17 : जिल्ह्यात 1 ते 15 फेब्रुवारी कालावधीत कोविडचे 971 रूग्ण आढळून आले असून आज सर्वाधिक म्हणजे 199 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यावरून जिल्ह्यात कोविड आजारामुळे बाधीत रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू करणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. संचारबंदीचे आदेश पारीत होताच जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी स्वत: रस्त्यावर येत कारवाई केली.
आदेशानुसार शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता संचारबंदी असणार आहे. आदेशान्वये शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास बंदी करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने कार्यक्रम, सभा, बैठका यासाठी केवळ 50 व्यक्तिंनाच परवानगी असेल. मिरवणूक व रॅली काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. या बाबत स्थानिक प्रशासन व पोलीस विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.
लग्नसमारंभाकरिता केवळ 50 व्यक्तींनाच उपस्थिरत राहता येणार आहे. या समारंभामध्ये सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. लग्नसमारंभाकरिता रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी अनुज्ञेय असेल. या बाबत स्थानिक प्रशासन व पोलीस विभाग आवश्यक ती कार्यवाही करणार आहे. मर्यादेपेक्षा जास्त व्यक्ती दिसून आल्यास आयोजक व मंगल कार्यालय, बॅंक्वेट हॉल, लॉन मालक यांचेवर योग्य कारवाई करण्यात येणार आहे.
लग्न समारंभाच्या नियोजित स्थळाव्यतिरिक्त इतर ठिकाणी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. हॉटेल, पानटपरी, चहाची टपरी, चौपाटी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व सोशल डिस्टसिंगचे नियम पाळणे बंधनकारक राहील. या ठिकाणी नागरीकांची गर्दी होत असल्याचे आढळुन आल्यास स्थानिक प्रशासनाकडून नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळुन आल्यास संबंधित व्यावसायिक, दुकानदार यांचेवर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व धार्मिक संस्था, स्थळे यांनी त्यांच्या धार्मिक संस्थानामध्ये, कार्यक्रमांमध्ये गर्दी होणार नाही, या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच सोशल डिस्टसिंग व मास्कचा वापर बंधनकारक राहील, याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये नागरीकांची गर्दी होणार नाही या बाबत स्थानिक प्रशासन (नगरपरिषद/नगर पंचायत /ग्राम पंचायत) यांनी दक्षता घेवून व आवश्यक पथकाचे गठन करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार आहे. जिल्ह्यामधील इयत्ता 5 वी ते 9 वी पर्यंत असलेल्या सर्व शाळा तसेच सर्व महाविद्यालये, सर्व प्रकारची खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण केन्द्र, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस दि. 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.
या कालावधीत ऑनलाईन/ दुरस्थ शिक्षण यांना परवानगी राहील. खाजगी आस्थापना, दुकाने या ठिकाणी मास्क , फेस कव्हर असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. तसेच हॉटेलमध्ये सुद्धा मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. या बाबत दर्शनी भागात बॅनर / फलक लावणे बंधनकारक असेल. नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळुन आल्यास स्थानिक प्रशासन दंडात्मक कार्यवाही करेल. हॉटलमध्ये तसेच बाहेरील आवारात पार्किंगसाठी गर्दी होणार नाही या बाबत योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करण्यात यावे. रांगा व्यवस्थापित करण्यासाठी व सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी विशिष्ट खुणा करण्यात याव्यात. तसेच दर्शनी भागात फलक लावण्यात यावा. अतिथी, ग्राहकांनी वापरलेले फेस कव्हर्स, मास्क, हातमोजे यांची संबंधीतांनी योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी.
यापूर्वी कोविड-19 चा प्रादुर्भाव फैलाव होवू नये, या करिता वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेशांचे उल्लंघन होणार नाही या बाबत आवश्यक दक्षता घेण्यात यावी. जिल्ह्या तील सर्व आठवडी बाजार दुपारी 4 वाजेनंतर बंद ठेवण्यात येणार आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र असणार आहे. सदर आदेश 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत लागू असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here