उषा पानसरे कार्यकारी संपादक मो.9921400542
आपला देशा आणि समाजाला येथील परंपरा, सण, उत्सव, चालीरिती यांनी पार समृद्ध करून सोडलंय. जागतिकीकरणातून होत असलेल्या शहरीकरणामूळं या लोकधारेचा प्रवाह काहीसा खंडीत झाल्याचं चित्रं अलिकडच्या काळात निर्माण झालं आहे. मात्र, हा समृद्ध वारसा आपल्या ग्रामीण भागातील गाव-खेड्यांनी अगदी प्राणपणाने जपला आहे. अशाच एका भक्ती परंपरेतून अध्यात्म अन आनंदाची अनुभूती देणा-या कार्यक्रमास मला उपस्थित राहता आलं.
पातूर तालूक्यातील जिल्ह्यातील शेवटचं गाव असलेल्या पिंपळखुटा गावानं गेल्या ४१ वर्षांपासून गावात एक वैभवशाली अध्यात्मिक परंपरा जपली आहे. ही परंपरा आहे नऊ दिवसांच्या ‘ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या’ची. नऊ दिवस या गावाचं अक्षरश: गोकूळ होऊन जातं. गावातील तरूण मंडळींचा हरिपाठ, उभं राहून भक्तीरसात बेभान होत खेळलेली ‘पाऊली’ पाहणं म्हणजे डोळ्यांची पारणं फेडणारा आनंद. अलिकडे गावाचं गावपण हरवत चाललं असतांना या गावानं ‘एकते’ची परंपरा कायम जपली. या कार्यक्रमात गावातील माता-भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं होतात. सर्व गाव यानिनित्तानं एक होऊन जातं. याच संस्कारातून या गावात व्यसनाधिनतेचं प्रमाणही अगदी नगण्य असल्यासारखं आहे.
पारायण सोहळ्याच्या समारोपाला मला उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं. गावातील ‘श्री.ज्ञानराज माउली मंडळा’चे कार्यकर्ते आणि मित्र कपिलभाऊ खरप यांच्यामूळे या आनंद अन भक्तीच्या सोहोळ्याला हृदयात साठवता आलं. तब्बल चार तास कार्यक्रमाला बसूनही गावातील स्त्रिया, आबाल-वृद्धांचा उत्साह शब्दांपलिकडचा होता. हा कार्यक्रम, येथील ‘ते’ तीन तास सर्वार्थानं नवा आनंद, ऊर्जा आणि ताकद देवून गेले.