(लातूर/निलंगा) प्रतिनिधी
डी.एस.पिंगळे
कै. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा खरा वारसदार मीच असून त्यांची स्वप्नपूर्ती केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या जयंती निमित्ताने दिली.
जिल्हा काॅंग्रेसमधील अंतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर मी गढीवाला नाही, पण वाडेवाला आहे;असा टोला देखील त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांना नाव न घेता लगावला.
लातूर जिल्ह्यात पक्षातंर्गत निर्णय, नियुक्त्या निलंगेकर यांना विश्वासात न घेता परस्पर केल्या जात असल्यामुळे ते सध्या नाराज आहेत. या नाराजीतूनच त्यांनी नुकतीच महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांची भेट घेऊन जिल्ह्यातील काँग्रेसच्या अंतर्गत कार्यपद्धतीचे गाऱ्हाणे देखील मांडले. त्यानंतर सोशल मिडियावर अशोकराव पाटील निलंगेकरांचा वाडा आणि बाभुळगावच्या गढीच्या वादाची चर्चा रंगू लागली आहे.
सध्या निलंगा मतदार संघासह लातूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या अंतर्गत धुसफुशीची जोरदार चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री कै. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा त्यांच्या काळात काॅंग्रेसमध्ये कायम दबदबा होता. श्रेष्ठीसह सर्वच स्तरावर त्यांना विचारल्याशिवाय कुठलेच निर्य घेतले जात नव्हते. पण कालांतराने निलंगेकरांच्या वाड्याचे महत्व कमी होऊन आता बाभुळगांवच्या वाड्याचे महत्व वाढल्याचे जिल्ह्यातील अनेक घटना घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे.
कै. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा राजकीय वारसा प्रदेश सरचिटणीस असलेले अशोकराव पाटील निलंगेकर हे चालवत असल्याचे बोलले जाते. मात्र जिल्ह्याच्या काँग्रेसकडून त्यांना नवा पर्याय निर्माण करण्याच्या हालचाली पक्षातंर्गत विरोधकांकडून सुरू आहेत. मतदार संघातील बहूतांश निर्णय त्यांना विश्वासात न घेता होत असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
त्यामुळे आगामी जिल्हापरिषद व नगरपालीका निवडणुकांमध्ये उमेदवारी देतांना मोठ्या प्रमाणात गटबाजी होऊ शकते. हे टाळण्यासाठी निलंगेकर समर्थक एकवटले आहेत. त्यातच कै.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीदिनी अशोक पाटील निलंगेकर यांनी माध्यमासमोर जनता ऐऱ्या-गैऱ्या लोकांना भीक घालत नाही, जे काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात उघड लढले, येथे येऊन चुकीचे विष पेरले त्यांना कधीही माफ करणार नसल्याचे सांगत निशाणा साधला.
मी काँग्रेसचा महाराष्ट्र सरचिटणीस आहे पण जिल्हाध्यक्ष मात्र जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी कामकरत असल्याचा आरोपही केला. यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांची गळचेपी होत आहे. मात्र हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही. लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष हे जातीयतेचे विष पेरण्याचे काम करत आहेत. निलंगा विधानसभा मतदार संघातील जनता असल्या गोष्टीला थारा देत नाहीत.
कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर आज जरी हयात नसले तरी त्यांची शिकवण ही जातीयवादाला खतपाणी घालणारी नव्हती. कधीही शिवाजीराव निलंगेकर यांनी जातियवाद केला नाही व कोणाला करू दिला नाही, असे सांगत जिल्हाध्यक्षांकडून होत असलेल्या कारभाराबाबत उघड नाराजी व्यक्त केली. यामुळे आता यापुढे देशमुख व निलंगेकर यांच्यातील संघर्ष अधिकच वाढणार असे दिसते.
गढी विरोधात वाडा असेच चित्र लातूर जिल्ह्यात सध्या निर्माण झाले असून याचे पडसाद येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती,महापालिकाव नगरपालिका निवडणूकीतून दिसून येणार आहेत. महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यावर कसा मार्ग काढतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.