हिंगणघाट मागील काही वर्षात हिंगणघाट शहराचा मोठ्या प्रमाणात लोकसंख्येच्या दृष्टीने विस्तार झालेला आहे.त्याचप्रमाणे छोट्या छोट्या उद्योगाच्या वाढीने विविध प्रांतातून येणाऱ्या कामगारांच्या संख्येतही मोठया प्रमाणावर वाढ झालेली आहे.त्यामुळे व अन्य कारणाने गुन्हेगारीतही मागील काही वर्षात प्रचंड वाढ झाल्याचे दिसत आहे.परंतु शहराची कायदा सुव्यवस्था सांभाळणारी यंत्रणा मात्र आहे तेवढीच मागील 50 वर्षांपासून कार्यरत आहे,त्यामुळे या भागात दुसरे पोलीस स्टेशनची त्वरित निर्मिती करावी अशी मागणी प्रहारचे पूर्व विदर्भ विभाग प्रमुख रुग्णमित्र- गजु कुबडे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री यांचेकडे एका निवेदनातून केलेली आहे.
निवेदनातून दिलेल्या माहितीनुसार,सद्य स्थितीत हिंगणघाट पोलीस ठाण्यात केवळ 135 कर्मचारी कार्यरत आहेत.शहराची लोकसंख्या ही लाखाच्या घरात गेलेली असून मागील काही वर्षात शहराच्या सीमारेषेतही बरीच मोठी वाढ झालेली असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे सद्यस्थितीत या पोलीस यंत्रणेवर शहराची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचा मोठा भार पडत आहे.त्यामुळे या ठिकाणी अजून एक वेगळे पोलीस स्टेशन ग्रामीण भागासाठी देण्यात यावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आलेली आहे.
श्री कुबडे आपल्या निवेदनात पुढे म्हणतात की, मागील काही दिवसात सतत चोरी,घरफोडी,हत्त्या, हाणामारीच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.अपुऱ्या पोलीस बळामुळे या गुन्हेगारीवर अंकुश ठेवणे पोलिसांना दिवसेंदिवस अशक्यप्राNय होत आहे.त्यामुळे आपण या भागात दुसरे नवीन पोलीस स्टेशनला मान्यता द्यावी अशी मागणी प्रहारचे रुग्णमित्र- गजु कुबडे यांनी गृहमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनेतून केलेली आहे.
सदर गृहमंत्री यांच्या नावाने लिहिलेले निवेदन आज दि 31 आगस्टला तहसीलदार श्रीराम मुंदडा याना देण्यात आले.या वेळी तालुका प्रमुख जगदीश तेलहांडे,माजी शहर प्रमुख अजय लढि,समुद्रपूर तालुका प्रमुख प्रमोद मैस्कार,सुरज कुबडे,अमित गोजे,मोहन पेरकुंडे,राजेश लाखाणी,अंकुश वाघमारे,राजरतन मानकर,चेतन काळे,विजय पडोळे,राजेश तांदूळकर,तबरेज पठाण,भूषण कुंभारे,संतोष जोशी,गोलू उजवणे,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा