शेगाव : दिवाळी म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन आनंद लुटण्याचा सण, परंतु समाजाने कायम दुर्लक्षित केलेला घटक म्हणजे तृतीयपंथीयांना सुद्धा दिवाळीचा आनंद घेता यावा व त्यांची सुद्धा दिवाळी गोड व्हावी या हेतूने येथील नव्याने रूजू झालेले तहसीलदार समाधान सोनवणे यांनी शहरातील तृतीयपंथी समाजसोबत दिवाळी साजरी केली. प्रत्येकाला साडी चोळी, मिठाई आणि भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्यात.
तहसीलदार समाधान सोनवणे म्हणाले की, साक्षात भगवान शंकर सुद्धा आपणांस अर्धनारीनटेश्वर रुपात पाहायला मिळतात. असे असूनही समाज यांच्याकडे कायम दुर्लक्ष करत आला आहे. परंतु सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी व या सर्वांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून मी आपणा सर्वांसोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या काळात अनेक तृतीयपंथी लोकांनी यशाची अनेक शिखरे सर केली आहेत. काही राज्यांच्या विधिमंडळात सुद्धा ते प्रतिनिधित्व करतात. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. आपणासही आपल्या भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा. आपणास काहीही अडचण आल्यास अथवा मदत लागल्यास मला केव्हाही संपर्क करू शकता.’ असेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.
या नाविन्यपूर्ण उपक्रमाने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होते. ‘एवढ्या वर्षात प्रथमच कोणीतरी आमचाही विचार केला आणि आमच्यासोबत दिवाळी साजरी केली. आम्हाला खूप आनंद झाला. तहसीलदार समाधान सोनवणे यांच्याप्रमाणेच बाकी समाजाने सुद्धा आम्हाला सामील करून घ्यावे. ‘ या शब्दात तृतीयपंथीयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे आयोजन तहसीलदार समाधान सोनवणे व मित्र परिवारातील सदस्यांनी केले होते.
तृतीयपंथी हा समाजातील उपेक्षित घटक असून समाजाने त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, तृतीयपंथी यांच्यातही मानवाचा जीव आहे.जन्म – मृत्यू कोणाचे हातात नाही.जन्म कुठे आणि स्री, पुरूष किंवा तृतीयपंथीय म्हणून झाला तर दोष त्या व्यक्तींचा नाही.त्यामुळे त्या जिवालाही जगवणे,जगू देणं ,त्यासाठी त्यांना समान संधी,समान वागणूक समाजाने दिली पाहिजे.असेही आवाहन त्यांनी केले.
@ कोविड लसीकरणासाठी हातभार लावावा…..
कोविड लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहीत करून राष्ट्रीय कार्यात सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी तहसीलदार समाधान सोनवणे यांनी तृतीयपंथीयांना केले.
यावेळी नारायण पाटील संचालक ज्ञान अर्णव अकॅडमी जळगाव खान्देश, अनिल सुर्वे संचालक चैतन्य फाउंडेशन जळगाव खानदेश, किरण जाधव, कल्पेश चौधरी,ओम तायडे,जिल्हा पत्रकार संघाचे माजी कोषाध्यक्ष संजय सोनोने, प्रेस क्लब अध्यक्ष अनिल उंबरकार,शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश चौधरी,अमर बोरसे,मंगेश ढोले, विजय नामदास आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.