संग्रामपूर येथील शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

0
100

 

प्रत्येक मूल ही राष्ट्राची संपत्ती आहे त्यामुळे प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे आणि त्या दृष्टीकोणातूनच पंचायत समिती संग्रामपूर चे गटशिक्षणाधिकारी श्री एन जे फाळके यांच्या नेतृत्वात, पुढाकाराने व मार्गदर्शनाने संग्रामपूर तालुक्यात चला करूया वर्ग अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.

या अभियानाचा उद्देश सर्व शिक्षकांच्या समोर जावा या उद्देशाने सर्व शिक्षकांच्या संयुक्त केंद्रस्तरीय शिक्षण परिषदा आयोजित करण्यात येत असून दिनांक 8 सप्टेंबर रोजी संग्रामपूर, निवाना, वरवट बकाल व एकलारा या केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख यांची जिल्हा परिषद हायस्कूल संग्रामपूर येथील खेतान सभागृहात संयुक्त शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली.

या शिक्षण परिषदेमध्ये आपल्या वर्गातील शंभर टक्के विद्यार्थी प्रगत कसे करावे, अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांकरीता अध्ययन स्तर निश्चिती करून पुढील उपाययोजनांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शाळेतील शैक्षणिक व भौतिक वातावरण निर्मिती करण्यास सर्वांना प्रोत्साहित करण्यात आले.

सर्व शाळांमध्ये नियोजनबद्ध दैनिक परिपाठ घेणे, अध्यापन करावयाच्या घटकांची पूर्वतयारी करून येणे, प्रभावी अध्यापन होण्यासाठी शाळेतील उपलब्ध साहित्य जसे टीव्ही, गणित पेटी, इंग्रजी पेटी, भाषा समृद्ध पेटी इत्यादी साहित्याचा नियमित वापर, शालेय परिसर स्वच्छ ठेवून सर्व विद्यार्थी गणवेशातील यासाठी प्रयत्न करणे, विद्यार्थ्यांची उपस्थिती 90% पेक्षा जास्त राहील यासाठी प्रयत्न करणे,

अनुपस्थितीत विद्यार्थ्यांच्या पालकांशी वारंवार संपर्क साधने, शालेय पोषण आहाराचा दर्जा उत्कृष्ट राखणे, लाभांच्या योजनांपासून विद्यार्थी वंचित राहणार नाही याकरिता दक्षता घेणे, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, विविध स्पर्धा परीक्षा जसे जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा,Nmmsपरीक्षा , ५/८ वी शिष्यवृत्ती परीक्षा यांची तयारी करून घेणे, आपली शाळा, आपला वर्ग सर्वोत्कृष्ट कसा राहील यासाठी प्रयत्न करणे,

शालेय वेळेत भ्रमणध्वनीचा वापर कमी करणे, शाळा व्यवस्थापन समिती सभा, पालक सभा, माता पालक संघाच्या नियमित सभा घेणे, आपल्या शाळेतील/ वर्गातील वातावरण सुसज्ज ठेवण्यासाठी शाळेला रंगरंगोटी करण्यासाठी ग्रामपंचायतचे सहकार्य घेणे, वृक्षारोपण करणे त्यासोबतच शाळा आयएसओ करण्यासाठी प्रयत्न करणे यासारख्या विविध बाबींवर शिक्षण परिषदेमध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

प्रत्येक मूल शिकू शकते हा विश्वास निर्माण झाल्याने आम्ही आमचा वर्ग , शाळा प्रगत करणारच असा विश्वास सर्व शिक्षक व्यक्त करीत आहेत.

या शिक्षण परिषदेमुळे शिक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढण्यास निश्चितच फायदा होईल असा विश्वास शिक्षण परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक गटशिक्षणाधिकारी श्री एन जे फाळके यांनी व्यक्त केला आहे.

शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी संग्रामपूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री मिलिंद सोनोने, निवाना केंद्राचे के प्र श्री श्याम कौलकार,एकलारा केंद्राचे के प्र श्री अनिल धनभर, वरवट बकाल केंद्राचे के प्र श्री राहुल इंगळे, समग्र शिक्षाचे कर्मचारी श्री कमलेश गोसावी ,उद्धव चव्हाण, इंगळे, वानखेडे, सहारे या सर्वांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here