गजानन सोनटक्के
जळगांव दि 14: जामोद मंडळ सर्कल मधील नागरिकांच्या वतीने आज दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन त्यात नमूद करण्यात आले की सोयाबीन व इतर पिक उत्पादक शेतकरी असून आम्ही सन 2020 मध्ये पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत रिलायन्स जनरल इन्सुरंस कंपनीचा सोयाबीन पिकाचा पीकविमा काढला होता. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे आमचे 100% सोयाबीन व इतर पिकाचे नुकसान झाले होते. नुकसानीचे प्रमाणानुसार आम्हाला 100% नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपनीकडून मिळणे गरजेचे आहे. मात्र सदर विमा कंपनीने जामोद मंडळ सर्कल मधील विमा काढलेल्या शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय केला असून एकरी 1200/- रुपये ते 1600/- इतकी तुटपुंजी रक्कम आमच्या खात्यावर नुकतीच जमा केली असून एक प्रकारे शेतकऱ्याची विमा कंपनीने थट्टाच केली आहे. वास्तविक जामोद मंडळ सर्कल ला लागुनच असलेल्या वडशिंगी सर्कलमध्ये पिक विम्याची रक्कम एकरी 10 ते 12 हजार रुपये दिली आहे. तसेच जामोद मंडळ सर्कल मधील यापुर्वी ऑनलाइन तक्रार करण्याऱ्या काही शेतकऱ्याच्या खात्यावर एकरी 6000 ते 8000 रुपये प्रमाणे विमा मिळाला आहे. अशा प्रकारे पीकविमा भरपाई रक्कम वाटप करतांना विमा कंपनीने नाहक भेदभाव केला आहे. यावरून आमच्या सोयाबीन पिकाच्या नुकसानी बाबतचा कृषी विभाग, महसूल विभाग व विमा कंपनी प्रतिनिधी यांनी चुकीचा अहवाल सादर केला असावा. त्यामुळे केवळ जामोद मंडळ सर्कल मधील शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी पिकविमा नुकसानीची रक्कम मिळाली आहे.