शिवसेनेचा ‘हा’ आमदार खंडणी घेतो, पक्षातील नेत्याचेच गंभीर आरोप, चेंडू उद्धव ठाकरेंच्या कोर्टात!

0
591

 

 

अकोला : अकोला जिल्हा शिवसेनेतील वाद काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीय. एका लेटरबाँबने या आरोप-प्रत्यारोपांच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे अकोल्याचे सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकरांनी पक्षाचे आमदार आणि जिल्हाप्रमुख नितीन देशमुखांवर गंभीर आरोप लावले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात पिंजरकरांनी आमदार देशमुखांवर थेट खंडणीचे आरोप लावले आहेत. आमदार नितीन देशमुखांनी मात्र सहसंपर्कप्रमुखांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

अकोला शिवसेना सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकरांचे आमदार नितीन देशमुखांवर गंभीर आरोप

शिवसेनेला मोठा धक्का, महिलेला मारहाण प्रकरणी आमदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
अकोला जिल्हा शिवसेनेत सध्या एका पत्राने मोठी खळबळ उडून दिली आहे. शिवसेनेचे सहाय्यक संपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकरांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना हे हे पत्र लिहिलंय. या पत्रात बाळापूरचे सेना आमदार आणि जिल्हाप्रमुख नितीन देशमुखांवर गंभीर आरोप लावण्यात आले आहे.

आमदार नितीन देशमुख हे खंडणीखोर आहेत. जिल्ह्यात खंडणी वसुलीत आमदार देशमुख सर्वात आघाडीवर असल्याचा पिंजरकरांनी पत्रात आरोप केलाय. जिल्ह्यात काम करणारे अधिकारी आणि कंत्राटदार नितीन देशमुखांना धास्तावले असल्याचा पिंजरकरांचा आरोप आहे. जिल्ह्यात शिवसेना संपवण्यासाठी आमदार देशमुख भाजपाशी संधान साधत असल्याचा सनसनाटी आरोप पिंजरकर यांनी केलाय. नितीन देशमुख यांच्या नेतृत्वातील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करुन नव्याने नेमणुका करण्याची मागणी त्यांनी पत्रातून केलाय.
अकोला शिवसेनेतील वादाला किनार आहे, ती विधान परिषद निवडणुकीतील पक्षाच्या लाजिरवाण्या पराभवाची. आमदार नितीन देशमुखांच्या दगाफटक्यांनीच तीनदा आमदार राहिलेल्या गोपीकिशन बाजोरियांचा पराभव झाल्याचा बाजोरिया गटाचा आरोप आहे. आमदार देशमुख भाजपशी संधान सांधत जिल्ह्यात पक्ष संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा बाजोरिया गटाचा आरोप आहे.
जिल्ह्यातील बाजोरिया गटातील असंतुष्टांनी यासंदर्भात नुकतीच मुंबईत पक्षाचे सचिव अनिल देसाईंची भेट घेत पक्षप्रमुखांना हे पत्र दिलं. माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांच्या नेतृत्वात ही भेट झाली. दरम्यान, या गंभीर आरोपांवर आमदार आणि जिल्हाप्रमुख नितीन देशमुखांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, अकोला शिवसेनेतील हे आरोप-प्रत्यारोप फार गंभीर आहे. यापेक्षाही गंभीर आहे ती पक्षानं यावर साधलेली चुप्पी. पक्ष या गंभीर आरोपांकडे गांभीर्यानं पाहत दूध का दूध, पाणी का पाणी करेल, ही अपेक्षा सेना कार्यकर्त्यांना आहे, आता चेंडू आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात….!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here