अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक
आरमोरी : जिल्ह्यात शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किंमतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने येथील आरमोरी शेतकी खरेदी विक्री सोसायटीच्या मार्फतीने धान खरेदी केल्या जाते.मात्र यावर्षी शेतकऱ्यांचे धान मळणी करून दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी मात्र शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झालेला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना कवडी मोल भावात धान विकावे लागत आहे.शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार करण्यात यावा.लवकरात लवकर सात दिवसाच्या आत आरमोरी येथील आधारभूत धांन खरेदी केंद्र सुरू करण्यात यावा, अन्यथा शेतकऱ्यांसोबत आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्या मनीषा दोनाडकर यांनी दिला आहे.
एप्रिल महिन्यात धान्याचे उत्पादन झाले,मे महिना संपूनही गेला तरीही आरमोरी येथे धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही.हि फार गंभीर बाब आहे.फक्त शेतकऱ्यांना आशेवर ठेवण्यासाठी सातबारे ऑनलाइन करण्यात येत आहे. परंतु अधिकचा वेळ धान खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी लागत असल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्याकडे अल्पशा किमतीत विकण्याची वेळ आली आहे.खाजगी व्यापारीसुद्धा सुरुवातीला ठोकळ धानाला १४०० ते १५०० रुपये दरम्यान भाव देत होते.परंतु आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने मागील १५ दिवसापासून खाजगी व्यापारी सुद्धा शेतकऱ्याला १२५० ते १३५० रुपये धानाला भाव देत असल्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे दिसून येत आहे.
उन्हाळ्यात पावसामुळे २० ते ३० टक्के धान जमीनीच्या खाली गळल्या गेला.त्यामुळे अगोदरच शेतकऱ्यांना उत्पादनात खूप मोठी घट निर्माण झाली आहे.धान पिका लागवड करण्यापासून ते कापणीपर्यंत एकरी २५ ते ३० हजार रुपये खर्च करावा लागत असून उत्पादन मात्र खर्चाच्या तुलनेत होत नाही.शासन धानाची १८६५ रुपये प्रती क्विंटल या हमीभावाने खरेदी करीत असल्या थोडा फार शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो.मात्र मे महिना संपला तरी खरेदी विक्री सोसायटी आरमोरीने धान खरेदी केंद्र सुरू केले नाही.येत्या सात दिवसाच्या आत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न केल्यास शेतकऱ्यांसोबत आंदोलन करून खरेदी-विक्री सोसायटी आरमोरीच्या व्यवस्थापकासह पदाधिकाऱ्यांना कार्यालयात कोंबून ठेवणार असल्याचा इशारा जि.प. सदस्या सौ मनिषा दोनाडकर यांनी दिला आहे.