लातूर /निलंगा प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे
जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील गौर येथील एका शेतीच्या हक्क सिध्द करण्याचा वाद सुरू असताना ज्यांना न्यायालयाने मनाई हुकूम दिला त्याच लोकावर निलंगा पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हे दाखल झाल्याने न्यायालयाच्या आदेशाची आणि कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दगडू रघुनाथ बारबीले यांनी लातूर विमानतळासाठी संपादीत झालेल्या जमिनीच्या मिळालेल्या मावेजातून गौर ता. निलंगा येथे 1999 मध्ये सर्वेनंबर 223 मध्ये दोन हेक्टर 60 आर जमीन खरेदी केली होती. त्या काळापासून ती जमीन मालकी या नात्याने कसत होते. सन 2020 मध्ये दगडू बारबीले यांनी सुनीता माधव पाटील रा. तुपडी यांना एक हेक्टर 60 आर जमीन विक्री केली. त्यावेळीच विठ्ठल हरिचंद्र पाटील, माधव हरिचंद्र पाटील, विलास पाटील, सुधाकर पाटील हे जमिनीमध्ये अडथळा करीत असल्याबाबत येथील न्यायालयात दगडू बारबीले यांनी दावा दाखल करून मनाई हुकूम मागितला.
दगडू यांची बाजू ग्राह्य धरून येथील सह दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर निलंगा यांनी 27 जानेवारी 2021 रोजी तात्पुरता मनाई हुकूम दिला. त्यामध्येच विठ्ठल हरिशचंद्र पाटील व ईतर यांनी मुळ मालक दगडू बारबीले यांच्याकडून ठरावपत्र करून जमीन आम्हास विक्री केली म्हणून न्यायालयात तात्पुरता मनाई हुकूम मागितला होता न्यायालयाने हे ठरावपत्र नोंदणीकृत नसल्यामुळे तात्पुरता मनाई हुकूम फेटाळला तरीही त्यांनी या जमिनीच्या शेतातील मशागती, विविध पीकाच्या राशी करीत असताना अडथळे निर्माण केले. त्यावरून निलंगा पोलिस ठाण्यात विठ्ठल हरिशचंद्र पाटील व ईतर जणाविरूध्द गुन्हे दाखल झाले.
त्या काळातच दगडू बारबीले यांनी सुनीता पाटील यांना विक्री केलेल्या एक हेक्टर 60 आर या क्षेत्रात विठ्ठल पाटील व ईतर 15 जण अडथळा करीत आहेत म्हणून सुनीता पाटील यांनी मनाई हुकूम मागितला होता हि मागणी ग्राह्य धरून येथील दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर निलंगा यांनी 23 फेब्रुवारी 2022 रोजी मनाई हुकूम दिला याबाबत दगडू बारबीले व सुनीता पाटील यांनी शेतातील रास करण्यासाठी पोलिस संरक्षणाची मागणी केली पोलिस अधिक्षक कार्यालयाने पोलिस बंदोबस्ताचा अर्ज फेटाळला होता.
मात्र न्यायालयाचा आदेश आपल्या बाजूने आहे म्हणून 13 मार्च 2022 रोजी शेतातील हरभरा पीक काढणी अभावी वाया जात असल्यामुळे दगडू बारबीले व सुनीता पाटील मजूरामार्फत पीक काढत असताना विठ्ठल हरिशचंद्र पाटील व त्यांच्या घरातील लोकांनी मनाई हुकूम असतानाही बेकायदा शेतामध्ये येऊन दगडू बारबीले, माधव पाटील, यादव पाटील यांना मारहाण करून दिवसा ढवळ्या पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला तरीही निलंगा पोलिसांकडून दोन्ही गटाच्या परस्पराविरोधात एकमेकांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
न्यायालयाचा मनाई हुकूम असताना बेकायदा शेतामध्ये येऊन जिवे मारण्याचा प्रयत्न होतो व न्याय मिळालेल्या लोकावरच पोलिसांकडून 307 सारखे गुन्हे दाखल होतात. त्यातील आरोपी पोलिसाच्या डोळ्यांसमोर फिरता असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे न्यायालयाचा न्याय मिळून तरी काय उपयोग असा हताश सवाल उपस्थित होत असून ज्यांच्यावर कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी आहे त्यांच्याकडूनही खर्या लोकांना संरक्षण मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक न्याय मिळाल्यानंतरही आपल्या मालमत्तेचे रक्षण करू शकत नाही तर न्यायालयाच्या ‘त्या’ न्यायाचा काय उपयोग असा सवाल अॕड जयंत देशपांडे यांनी उपस्थित होत आहे.