अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्या – माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट:- १८ ऑक्टो
माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांची जिल्हाधिकारी कडे मागणी.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई म्हणून सरकारने ०३ हेक्टर पर्यंत जाहीर केलेली मदत न दिल्याबाबत तसेच सरकारने शेतकऱ्याला घोषित केलेली अतिवृष्टीची मदत बँक ऑफ इंडिया हिंगणघाट व इतर शाखांनी पीक कर्जाच्या लोनमध्ये कपात करत असल्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा नेत जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले. त्यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने रोष व्यक्त करण्यात आला.
खरिपाच्या हंगामात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून ऑक्टोबर महिन्याच्या आज मिती पर्यंत सततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके जळाली. अतिवृष्टीमुळे नदी नाल्याचे पाणी शेतात साचल्यामुळे शेती खरडून गेली आणि काही शेतकऱ्यांच्या शेतात गाळ साचून पिके नष्ट झाली. त्यामुळे शेतकरी अंधकारमय चाकोरीतून वाटचाल करीत आहे.
सरकारने शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकाचे नुकसानीचा आढावा घेऊन ०३ हेक्टर पर्यंत मदत जाहीर केली परंतु वेळा येथील पटवारी श्री.कपूर यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर ०३ हेक्टरची मदत दाखविली नाही त्यामुळे ज्यांच्याकडे १० एकर,१५ एकर,२० एकर,२९ एकर जमीन अतिवृष्टीमुळे पिके नष्ट झाली त्यांना ०१ हेक्टर पर्यंत १३ हजार रुपयाची सरकारकडून जमा झाली. तर काहींना फक्त ०८ हजार १६० रुपये खात्यात जमा झाली.
अशाप्रकारे वेळा येथील पटवारी श्री.कपूर यांनी शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीपासून वंचित ठेवून सरकारची लफ्तरे वेशीवर टांगली आहे. तरी त्वरित सर्वे करून शेतकऱ्यांना घोषित केलेली सरकारची हक्काची मदत देण्यात यावी तसेच संबंधित पटवाऱ्याने शासकीय कामात दुर्लक्ष केले त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
तसेच काजळसरा येथील शेतकरी चोखाराम डफ यांना १७ एकर ७४ आर शेती असताना फक्त ०२ हेक्टरची मदत खात्यात जमा झाली. अशा अनेक शेतकरी या निष्काळजीपणामुळे मदतीपासून वंचित आहे.त्या गावला सौ.ढोक मॅडम या पटवारी असून त्यांनी सुद्धा सर्वे करून शेतकऱ्याला ०३ हेक्टर पर्यंत मदत दाखविली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण मदत झाली नाही.
तसेच बँक ऑफ इंडिया हिंगणघाट शाखेने काजळसरा येथील शेतकरी चोखाराम डफ व इतर शेतकऱ्यांची मदत पीक कर्जात कापून सरकारचे नियम धाब्यावर ठेवले आहे. तरी संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी गुणवंत कामडी, सतीश सायंकार, चोखाराम डफ, वामन वरघणे, नागो भुते,सुभाष शेंडे, शंकर भुते,नारायण लोणकर, सुरेश नखाते ,बंडूजी वाघमारे, बादशहाराव नखाते,नामदेव लोणकर,रुपेश तळवेकर, नारायण नखाते,प्रवीण आत्राम, मधुकर गायकवाड,शोभा सायंकार,कृष्णा बोरकर,अभिलाष कामडी, सिद्धेश सायंकार,सुजल शेंडे,देवा शेंडे आदि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment