सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट दि.२३ जुलै तालुक्यात सर्वत्र सततधार पाऊस सुरु असल्याने कष्टकरी,शेतमजूर धास्तावल्याचे दिसुन येत असून शेतकऱ्यांचा कामातसुद्धा अडथळा निर्माण झाल्याचे दिसुन येत आहे.
शहरात तसेच तालुक्यात अतिवृष्टिमुळे जीवितहानी झाल्याची घटना घडली नसली तरी तालुक्यातील लाडकी येथील विजय नौकरकार यांचे राहते घर दि.२२ रोजी कोसळले आहे.
त्यांचे गृहउपयोगी कूलर, मशीन व इतर साहित्यसुद्धा मलब्यात दबले.
शहरातील पंचायत समिति प्रवेशद्वाराजवळच असलेला कवठाचा वृक्षसुद्धा काल रात्रीतुन मुळापासून उन्मळून पडला.
गेल्या २ दिवसांपासून सततधार पावसामुळे शहरातील मोठ्या नाल्याशेजारी वसलेल्या झोपड़पट्टीवासियांनासुद्धा अतिवृष्टिमुळे झोपडित पाणी शिरण्याची चिंता होती,परंतु आज शुक्रवारी दुपारपासून पावसाने उघाड दिल्याने सुर्याचेसुद्धा दर्शन झाले.आता शेतातील पिके बाळसे धरु लागली असून सोबतच शेतातील तण वाढल्याने तणनाशकाची फवारणी करणे सुरु आहे,परंतु सततधार पावसामुळे फवारणीसारखी अनेक महत्वाची कामे थांबली असल्याने शेतमजूरांच्या हाताला कामसुद्धा मिळणे अशक्य झाले होते.आता पावसाने विराम दिल्याने बळीराजा पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाल्याचे दिसुन येत आहे.