उमरगा (आनंदीपूर ) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त उमरगा शहरात प्रमुख नागरिक संगोष्ठीचे आयोजन करण्यात आले. शहरातील डिग्गी रोडवरील कन्हैया मंगल कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.dharashivnews
या संगोष्ठीत पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया यांनी मुख्य वक्ते म्हणून मार्गदर्शन केले, तर जिल्हा कार्यवाह अजय जानराव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
डॉ. भाडेसिया यांनी आपल्या भाषणात संघाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकताना सांगितले की, “संघाचे कार्य हे संपूर्ण विश्व अधिक श्रेष्ठ करण्याच्या भावनेतून चालते. ‘इदं न मम’ म्हणजेच ‘हे माझे नाही’ हा भारतीय संस्कृतीचा मूलमंत्र असून त्यातून निस्वार्थ भाव, त्याग आणि समर्पणाची शिकवण मिळते.” त्यांनी पुढे नमूद केले की, संघाचे कार्य आपल्या भारत देशाला विश्वगुरू बनवण्यासाठीच आहे आणि शिस्त व कार्यपद्धतीमुळेच संघाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी संघाच्या विचारधारेत एकात्मतेला महत्त्व असल्याचेही स्पष्ट केले. Umrganews
व्यक्ती निर्माण हा संघाच्या कार्याचा गाभा असल्याचे सांगत त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या विचारांचा उल्लेख केला. “संघाचे कार्य बाहेरून जितके साधे दिसते, त्यामागील गूढ आणि गहराई तितकीच विशाल आहे. ज्ञान, आध्यात्म, सेवा आणि साधना यांसारखी मूल्ये संघात रुजवली जातात. नियमित शाखेत सहभागी झाल्यास स्वयंसेवकाचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडते,” असे ते म्हणाले.
संघाच्या प्रार्थनेचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, प्रार्थनेत भारतमातेप्रती समर्पणाचा भाव आहे आणि भगवा ध्वज हा संघाचा गुरु मानला जातो. “संघाचा स्वयंसेवक प्रसिद्धीपेक्षा समाजातील अडचणी दूर करण्यावर भर देतो.
तो स्वतःसाठी नव्हे, तर समाज आणि राष्ट्रासाठी कार्य करतो,” असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. उपस्थित नागरिकांनीही संघाच्या कार्याबाबत उत्सुकता व्यक्त करत चर्चेत सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्यरीत्या पार पडले असून, उमरगा शहरात संघाच्या विचारांचा प्रसार आणि समाजजागृतीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.








