ARYAN KHAN: आर्यन खानला जामिन न मिळण्याच कारण काय?

 

SURYA MARATHI NEWS

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख( shahrukh khan खानचा मुलगा आर्यनला aryan एका क्रूजवर झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणी अंमलीपदार्थ विरोधी विभागाच्या पथकानं (NCB) तीन ऑक्टोबरला अटक केली होती.

जवळपास तीन आठवड्यांनंतरही हे प्रकरणं चर्चेत आहे. त्यामागचं मोठं कारण म्हणजे आर्यन खानला अद्याप जामीन मिळालेला नाही.
मुंबईच्या एका विशेष न्यायालयानं 20 ऑक्टोबरला आर्यन खान आणि इतर दोन आरोपींना जामीन देण्यास नकार दिला.
आर्यन खानकडे कोणतंही ड्रग्ज आढळलेलं नाही. तरीही त्याचा मित्र अरबाज मर्चंट याच्याकडे बंदी असलेले अंमली पदार्थ असल्याची माहिती त्याला होती. तसंच ते दोघं सोबतच होते, त्यामुळं या प्रकाराला ‘कॉन्शियस पझेशन’ (ड्रग्ज असल्याची माहिती असणे) समजलं जाईल, असं कोर्टानं जामीन फेटाळताना म्हटलं.
अरबाज मर्चंटकडून सहा ग्रॅम चरस जप्त करण्यात आलं होतं. शिवाय NCB न्यायालयासमोर सादर केलेल्या व्हाट्सअॅप चॅटचा उल्लेखही जामीन नाकारताना केला होता.
आर्यन खान ड्रग्ज संदर्भात अज्ञात लोकांशी चर्चा करत होता. त्यात ड्रग्जचं अधिक प्रमाण आणि हार्ड ड्रग्जबाबत चर्चा सुरू होती, हेही त्यावरून स्पष्ट होतं, असं न्यायालयानं म्हटलं.
त्यामुळं आर्यन खान ( aryan khan) प्रतिबंधित अंमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांच्या संपर्कात होता आणि नियमितपणे मादक पदार्थांशी संबंधित अवैध कृत्यांमध्ये त्याचा समावेश होता, हे प्रथमदर्शनी दिसत असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे.
त्यामुळं जामीनावर असताना आर्यन खान पुन्हा असं कृत्य करणार नाही, याबाबत न्यायालयानं साशंकता व्यक्त केली.
या प्रकरणात प्रथम दर्शनी पाहता, कट रचल्याचे (नियोजनबद्धरित्या सर्व काही केल्याचे) पुरावे आहेत आणि सुनावणीदरम्यान यावर सखोल चर्चा केली जाईल, असंही विशेष न्यायालयानं म्हटलं.
या प्रकरणी आर्यन खानच्या aryan khan विरोधात काहीही पुरावे नसल्याचं बचाव पक्षाचं म्हणणं होतं. मात्र सर्व आरोपी एकाच धाग्यानं जोडलेले असून ते एका मोठ्या नेटवर्कचा भाग असू शकतात, असं न्यायालयानं म्हटलं.
आर्यन खानला एनसीबीनं NCB तीन ऑक्टोबरला ड्रग्जशी संबंधित एका छाप्या प्रकरणी अटक केली होती.
एनसीबीनं मुंबईच्या किनाऱ्यावर एका क्रूजवर छापा मारून आर्यन खानसह अनेकांना ड्रग्जचं सेवन आणि कट रचल्याप्रकरणी अटक केली होती. या प्रकरणात आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे.
आर्यन खानसह इतर आरोपींना एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 (सी) सह 20 बी (खरेदी), 27 (विक्री), 28 (गुन्हा करण्याचा प्रयत्न), 29 (चिथावणी देणे, कट रचणे) आणि 35 (सदोष मानसिक स्थितीची शक्यता) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
प्रकरणाशी संबंधित मोठे प्रश्न
आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडलेले नाही. तसंच तो ड्रग्ज सेवन करत असल्याचाही पुरावा देण्यात आलेला नाही, मग त्याला जामीन कोणत्या आधारावर नाकारला जात आहे? हा प्रश्न वारंवार समोर येत आहे.
Midea मीडिया हाईप आणि एनसीबीच्या भूमिकेमुळं आर्यन खानला जामीन मिळण्यात अडचणी येत असल्याचं सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील विकास सिंग म्हणाले.
“हा कायदा प्रामुख्यानं आरोपीकडे ड्रग्ज मिळण्यासंदर्भात आहे. आरोपीकडून किती प्रमाणात ड्रग्ज जप्त झाले त्यावरूनच शिक्षादेखील ठरते,” असंही ते म्हणाले.
”या प्रकरणात आर्यन खान ग्राहक असेल, तर ग्राहकासाठी हा गुन्हा जामीनपात्र आहे. ग्राहक म्हणून आर्यन खान विरुद्ध हे प्रकरण कमकुवत असण्याचं कारण म्हणजे, त्याच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आलेले नाही, किंवा त्याच्या रक्ताचे नमुने अथवा हेअर फॉलिकल्सदेखील घेण्यात आलेले नाही.”
आश्चर्यकारक बाब म्हणजे, एनसीबीनं आर्यन खानला वैद्यकीय तपासणीसाठी नेलं मात्र, त्याच्या रक्ताचे, लघवीचे अथवा हेअर फॉलिकल्सचे नमुने घेण्यात आले नाही.
ड्रग्जशी संबंधित प्रकरणांमध्ये आरोपीच्या रक्त आणि लघवीच्या नमुन्यांसह हेअर फॉलिकल टेस्टद्वारे केसांचे नमुने घेऊन अंमली पदार्थांच्या सेवनाची माहिती मिळवली जाते.

सर्व परिस्थितीत तज्ज्ञांच्या मते एनसीबीचा संपूर्ण खटला हा आर्यन खान ड्रग्जची तस्करी आणि संपू्र्ण कटात सहभागी होता यावर आधारित आहे. या आरोपांमुळं न्यायालयाकडून त्याला जामीन मिळणं कठीण ठरणार आहे.
दरम्यान, वकील आशिमा मंडला यांच्या मते, सरकारी पक्षाच्या खटल्यात अनेक कमतरता आहेत.
“आरोपींवर लावलेली कलमं, ड्रग्ज बाळगणे आणि वापराशी संबंधित आहेत. मात्र हे आरोप सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाला ठोस पुरावे सादर करता आलेले नाहीत,” असं त्या म्हणाल्या.
(NCB)एनसीबीनं आधी आर्यन खानकडे (ARYAN kHAN) ड्रग्ज आढळल्याचं म्हटलं आणि नंतर त्याला नकार दिला, असं मंडला म्हणाल्या.
नंतर असं सांगण्यात आलं की, तो ड्रग्जचा वापर करत होता, मात्र ते सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही वैद्यकीय पुरावे नाहीत.
“म्हणजे तो पेडलर आहे, असं एनसीबीला म्हणायचं आहे का? जर हा आरोप असेल तर जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचं प्रमाण कमी असल्यानं हे सिद्ध करणंही कठीण ठरेल,” असंही त्या म्हणाल्या.
जामीनाचा निर्णय हा केवळ न्यायालयासमोर ठेवलेल्या पुराव्यांच्या आधारे केला जातो, प्रकरणाच्या गुण-दोषांच्या आधारावर नाही, असंही त्या म्हणाल्या.
शिवाय जर प्रकरण कॉन्शियस पझेशनचं असेल तर क्रूजवरील इतरांवर हा आरोप का लावला नाही? केवळ 20 लोकांपुरतंच हे प्रकरण मर्यादीत का ठेवण्यात आलं, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
संपूर्ण प्रकरण व्हॉट्सअॅप चॅटवर आधारित?
तज्ज्ञांच्या मते, आतापर्यंत या प्रकरणात समोर आलेली माहिती पाहता, एनसीबीचा या आरोपींच्या विरोधातील खटला केवळ व्हॉट्सॅप चॅटवर आधारित आहे.
गेल्या वर्षी अभिनेत्री रिया चक्रवर्ती (reya chakrvati) हिच्या अटकेच्या वेळीदेखील अशाच प्रकारचा घटनाक्रम पाहायला मिळाला होता. अनेक दिवसांच्या चौकशीनंतर एनसीबीनं बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ड्रग्सशी संबंधित एका प्रकरणात गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात अटकही केली होती.
28 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टानं जामीनावर सोडलं होतं.
आर्यनच्या वकिलांनीही हायकोर्टात धाव घेतली आहे. त्याच्या जामीन अर्जावर 26 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
व्हॉट्सअप चॅट पुरेसे आहेत का?
या प्रकरणातही आर्यन खानला जामीन नाकारण्याचं कारण हे, व्हाट्सअॅप चॅटच असल्याचं सांगण्यात आलं. त्यात आर्यन खान अज्ञात लोकांशी ड्रग्जबाबत चॅटिंग करत असल्याचं सांगण्यात आलं.
म्हणजे केवळ व्हाट्सअॅप चॅटच्या आधारे आर्यन खानचा जामीन अर्ज नामंजूर होऊ शकतो का?
द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रातील 15 जुलैच्या एका वृत्तानुसार सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पीठानं एका प्रकरणाच्या सुनावणीत, व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील मॅसेजला काहीही महत्त्वं नसल्याचं म्हटलं होतं.
या वृत्तानुसार सोशल मीडियावर सध्या काहीही तयार केलं किंवा हटवलं जाऊ शकतं. न्यायालय व्हाट्सअॅप मॅसेजला महत्त्व देत नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं.
आशिमा मंडला यांच्या मते, जर एनसीबीकडे व्हाट्सअॅप चॅटमध्ये आरोपींच्या विरोधात पुरावे असतील, तर त्यांनी नावं जाहीर न करता न्यायालयासमोर ती सादर करून, स्पष्टपणे आरोप लावावा.
अधिक माहितीसाठी वाचा – व्हॉट्सअॅप चॅट आरोपीविरोधात पुरावा म्हणून ग्राह्य धरता येतं?
‘मीडिया ट्रायल अधिक, तपास कमी’
कायदा कडक आहे की नाही हा मुद्दा या प्रकरणात नाही. तर त्या कायद्याचा वापर योग्य पद्धतीने केला जात आहे का? हा मुद्दा आहे, असं वकील विराग गुप्ता म्हणाले.
“या प्रकरणावर मीडिया ट्रायल जास्त होत आहे, आणि ज्या गांभीर्यानं अशा गुन्ह्याच्या विविध पैलूंची चौकशी व्हायला हवी, तेवढी होताना दिसत नाही,” असंही ते म्हणाले.
”जर आर्यन खान आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असेल, तर अटकेच्या एवढ्या दिवसांनंतरही त्याच्या संबंधित ठिकाणांवर छापे आणि बँक खात्यांची चौकशी करणंही गरजेचं आहे. त्याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.”
मात्र, एनसीबीनं आर्यन खानवर तो एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी करणाऱ्या समुहाचा भाग असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळं त्याला जामीन मिळणं कठिण आहे, असं गुप्ता म्हणाले.
आरोपी आणि त्याचं कुटुंब प्रसिद्ध आणि चर्चित असल्यानं पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते, असं सांगून एनसीबी जामीनाला विरोध करत आहे.
लक्ष वेधून घेण्याचा प्रकार?
“हा दावा खरा असेल तर मग, व्हॉट्सअॅप चॅट आणि आरोपींच्या कबुली जबाबांशिवाय एनसीबीनं इतर पुरावे गोळा करण्यासाठी का प्रयत्न केला नाही, असं विराग गुप्ता म्हणाले.
”आर्यनशी संबंधित बँक खाते सील करण्याबरोबर घरी छापे मारून, महत्त्वाची कागदपत्रं का जप्त करण्यात येत नाही. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे तसं केल्यास रॅकेटचा भांडाफोड होईल आणि संपूर्ण टोळीला शिक्षा देता येऊ शकेल?
एनसीबीकडून हाय-प्रोफाईल अटक ही माध्यमांचं लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा कधी-कधी दुसऱ्या एखाद्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी केली जाते, असं विकास सिंह म्हणाले.
“गेल्या वर्षीही एनसीबीनं अनेक सेलिब्रिटींना बोलावत त्यांची अनेक दिवस चौकशी केली होती,” असंही ते म्हणाले.
एनसीबी केवळ लोकांना त्रास देण्यासाठी कायद्याचा दुरुपयोग करत असल्याचं, विकास सिंह म्हणाले.
“ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्या मोठ्या माशांना सोडून, गुन्ह्यात शिकार ठरलेल्या लोकांच्या मागं लागण्यावर एनसीबीनं NCB लक्ष केंद्रीत केलं आहे,”असंही सिंह यांनी म्हटलं.

SURYA MARATHI NEWS

Leave a Comment