Home Blog

Yavalnews /नगराध्यक्षांना सन्मानाचे स्थान न दिल्याचा आरोप; यावल आगारातील कार्यक्रमावर अतुल पाटलांचा बहिष्कार

 

लोकनियुक्त नगराध्यक्षांना अपेक्षित सन्मान न मिळाल्याचा आरोप; शासकीय कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा दावा

यावल (प्रतिनिधी : विकी वानखडे)

यावल आगार येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने पाच नवीन अत्याधुनिक बसेसच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला सुरुवातीपासूनच प्रोटोकॉलच्या मुद्द्यावरून वादाचे स्वरूप प्राप्त झाले. यावल नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांना कार्यक्रमात अपेक्षित सन्मान व प्रोटोकॉल देण्यात आला नसल्याचा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी केला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे सांगण्यात आले.

नगराध्यक्षांना व्यासपीठावर अपेक्षित स्थान न मिळाल्याचा आरोप
लोकार्पण सोहळ्यासाठी नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील उपस्थित असतानाही त्यांना व्यासपीठावर योग्य सन्मानाचे स्थान देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान त्यांना बाजूच्या खुर्चीवर बसावे लागले. तसेच दीपप्रज्वलनाच्या वेळी त्यांचे नाव उशिराने घेण्यात आल्याचेही अतुल पाटील यांनी म्हटले आहे.

सत्काराच्या वेळीही नगराध्यक्ष पदाचा आवश्यक तो प्रोटोकॉल पाळण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला. लोकनियुक्त नगराध्यक्ष या नात्याने सौ. छायाताई पाटील या कार्यक्रमातील प्रमुख लोकप्रतिनिधींपैकी एक असताना त्यांना अपेक्षित सन्मान न मिळाल्याने उपस्थितांमध्येही नाराजीची चर्चा होती, असा दावा करण्यात आला.

शासकीय कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेपाचा आरोप
या प्रकाराबरोबरच कार्यक्रमाच्या नियोजन व सूत्रसंचालनावरूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालनाची जबाबदारी आगार प्रशासनाची असताना काही भाजप पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमादरम्यान माईक हातात घेऊन सूत्रसंचालनात हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला.

यामुळे शासकीय स्वरूपाच्या कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप करून कार्यक्रमावर राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप अतुल पाटील यांनी केला. शासकीय कार्यक्रम हा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसतो. त्यामुळे अशा कार्यक्रमात प्रशासनाने सर्व लोकप्रतिनिधींना त्यांच्या पदानुसार समान सन्मान देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.jalgaonnews

अतुल पाटील यांचा कार्यक्रमावर बहिष्कार
नगराध्यक्षांच्या प्रोटोकॉलचा कथित अवमान झाल्याने संतप्त झालेल्या माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी आगार प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकनियुक्त नगराध्यक्षांचा सन्मान राखला जात नसेल, तर अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका घेत त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.
“लोकनियुक्त नगराध्यक्षांचा सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा विषय नसून संपूर्ण यावल शहराच्या जनतेने दिलेल्या लोकशाही अधिकाराचा सन्मान आहे.

शासकीय कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असेल, तर त्याचा निषेध करणे आवश्यक आहे,” अशी भूमिका अतुल पाटील यांनी मांडली.grampanchayat

“लोकप्रतिनिधींचा सन्मान पक्षीय राजकारणापेक्षा मोठा”
यावेळी अतुल पाटील यांनी शासकीय कार्यक्रम आणि पक्षीय कार्यक्रम यामध्ये स्पष्ट फरक असला पाहिजे, असे सांगितले. प्रशासनाच्या कार्यक्रमात राजकीय शक्तिप्रदर्शनाला स्थान नसावे, अशी भूमिका त्यांनी घेतली.

“राजकारण करायचे असेल तर ते निवडणुकीच्या मैदानात करा; मात्र शासकीय कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा प्रोटोकॉल आणि सन्मान पायदळी तुडवून राजकीय शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. लोकनियुक्त नगराध्यक्षांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत मान्य केला जाणार नाही,”

Yavlnewa/अशी संतप्त प्रतिक्रिया अतुल पाटील यांनी व्यक्त केली.दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे यावलच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, शासकीय कार्यक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींचा प्रोटोकॉल नेमका कसा पाळला जातो, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या आरोपांवर आगार प्रशासन तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांची भूमिका काय आहे, याकडे आता यावलकरांचे लक्ष लागले आहे

MMRDA JE भरतीच्या निकालावर प्रश्नचिन्ह? एकाच केंद्रातील अनेक टॉपर्सच्या दाव्याने खळबळ अभिजीत दिपके यांची सखोल चौकशीची मागणी; विद्यार्थ्यांच्या मनात उपस्थित झाले गंभीर सवाल

 

मुंबई | प्रतिनिधी

महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDAच्या ज्युनियर इंजिनिअर भरती परीक्षेच्या निकालावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. निकालातील काही बाबींवर उमेदवारांकडून आक्षेप नोंदवले जात असून, परीक्षा प्रक्रियेत काही अनियमितता झाली का, याची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे.

CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या प्रकरणाकडे लक्ष वेधलं आहे. अनेक परीक्षार्थींनी MMRDA JE भरती परीक्षेतील कथित अनियमिततेबाबत आपल्याशी संपर्क साधल्याचा दावा दिपके यांनी केला आहे.
नेमका आरोप काय?

उमेदवारांकडून करण्यात येत असलेल्या दाव्यानुसार, इतर स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित कामगिरी न करणारे काही उमेदवार MMRDA JE परीक्षेत थेट उच्च गुण मिळवून टॉपर्सच्या यादीत आल्याचे सांगितले जात आहे.
यासोबतच निकालातील अनेक टॉपर्स एकाच परीक्षा केंद्रातील असल्याचा दावाही करण्यात येत आहे.
यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

जर हे दावे चुकीचे असतील तर त्यामागचं सत्य काय? आणि जर निकालामध्ये खरोखरच काही अनियमितता झाली असेल, तर त्याची व्याप्ती किती आहे? या प्रश्नांची उत्तरं आता अधिकृत तपासणीतूनच समोर येऊ शकतात.104 जागांसाठी परीक्षा MMRDA JE भरती 2026 अंतर्गत विविध अभियांत्रिकी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. उपलब्ध माहितीनुसार या भरती प्रक्रियेत 104 पदांचा समावेश होता.

ही परीक्षा 11 आणि 12 मे 2026 रोजी ऑनलाइन CBT पद्धतीने घेण्यात आली. त्यानंतर 15 ऑगस्ट 2026 रोजी निकाल जाहीर झाल्याची माहिती आहे.
निकाल समोर आल्यानंतर काही उमेदवारांनी गुणांबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत.

190 पेक्षा जास्त गुणांचा दावा काही उमेदवारांना 190 पेक्षा अधिक गुण मिळाल्याची चर्चा सुरू असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे, यापैकी काही उमेदवार पहिल्यांदाच स्पर्धा परीक्षा देत असल्याचेही दावे सोशल मीडियावर आणि उमेदवारांकडून केले जात आहेत.मात्र, या सर्व दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

त्यामुळे या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे — दाव्यांची सत्यता तपासणे.
CBT परीक्षेचा डिजिटल डेटा महत्त्वाचा
MMRDA JE परीक्षा ऑनलाइन CBT पद्धतीने झाल्यामुळे परीक्षा प्रक्रियेशी संबंधित डिजिटल नोंदी उपलब्ध असण्याची शक्यता आहे.

यामध्ये उमेदवाराची परीक्षा सुरू झाल्याची वेळ, प्रश्न सोडवण्याची पद्धत, उत्तर नोंदी, लॉगिन आणि परीक्षा केंद्राशी संबंधित डिजिटल माहिती यांसारख्या बाबी तपासल्या जाऊ शकतात.

त्यामुळे जर अधिकृत चौकशी करण्यात आली, तर परीक्षा केंद्रनिहाय निकाल, उमेदवारांची मागील परीक्षांमधील कामगिरी, गुणांमधील असामान्य वाढ आणि उपलब्ध डिजिटल डेटा यांची पडताळणी महत्त्वाची ठरू शकते.

विद्यार्थ्यांचा मोठा सवाल सरकारी नोकरी मिळवण्यासाठी हजारो विद्यार्थी वर्षानुवर्षे अभ्यास करतात. अनेक विद्यार्थी आर्थिक आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करत स्पर्धा परीक्षांची तयारी करतात.

अशा परिस्थितीत एखाद्या भरती परीक्षेच्या निकालाबाबत शंका निर्माण झाली, तर त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या विश्वासावर होतो.
त्यामुळे उमेदवारांची मागणी आहे की, आरोप खरे आहेत की चुकीचे, हे स्पष्ट करण्यासाठी निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि संपूर्ण परीक्षा प्रक्रियेबाबत पारदर्शकता ठेवण्यात यावी.

आता MMRDA काय भूमिका घेणार?
अभिजीत दिपके यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

आता या आरोपांवर MMRDA आणि संबंधित परीक्षा यंत्रणा काय भूमिका घेतात? चौकशी समिती नेमली जाते का? परीक्षा केंद्रनिहाय निकाल आणि डिजिटल डेटाची तपासणी केली जाते का? याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

सध्या उपलब्ध माहितीच्या आधारे परीक्षा घोटाळा झाला असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. मात्र, निकालाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असल्याने या दाव्यांची अधिकृत आणि पारदर्शक चौकशी होणे गरजेचे आहे.कारण प्रश्न केवळ काही उमेदवारांच्या निकालाचा नाही…

प्रश्न आहे तो हजारो विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, त्यांच्या भवितव्याचा आणि सरकारी भरती प्रक्रियेवरील विश्वासाचा.

MMRDA JE भरतीतील या कथित अनियमिततेमागचं सत्य चौकशीतून समोर येणार का?
याकडे आता संपूर्ण स्पर्धा परीक्षा विश्वाचं लक्ष लागलं आहे.

SindkhedRaja/ सिंदखेडराजातील राजमाता जिजाऊ स्मारकासाठी आणखी ५० कोटींचा निधी; कामाला मिळणार गती

 

संपादक : अनिलसिंग चव्हाण

बुलडाणा | सिंदखेडराजा : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या स्मारकाच्या विकासाला आता मोठी चालना मिळणार आहे. नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून स्मारकासाठी आणखी ५० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. स्मारकाच्या कामाला गती देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.jijaumata

सिंदखेडराजा ही राजमाता जिजाऊ माँसाहेबांची जन्मभूमी असल्याने या स्थळाला ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. येथे उभारण्यात येणारे जिजाऊ स्मारक आणि जिजाऊसृष्टी हे परिसराच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प मानले जात आहेत.

२०२४ मध्ये ५० कोटींची घोषणा

सिंदखेडराजा परिसरातील जिजाऊसृष्टी आणि स्मारकाच्या विकासासाठी यापूर्वी २०२४ मध्ये ५० कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला होता. या निधीतून सिंदखेडराजा शहरालगत असलेल्या जिजाऊसृष्टीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत या कामासाठी सुमारे २७ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला असून, प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.sindkhedraja

मात्र शहरातील लखुजी जाधव यांच्या ऐतिहासिक वाड्यातील प्रत्यक्ष राजमाता जिजाऊ स्मारकाच्या कामाला वेग देण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता होती. ही बाब लक्षात घेऊन शासनाने आता आणखी ५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
स्मारकासोबत रस्ते आणि सुविधांचाही विकास
नवीन निधीतून केवळ स्मारकाचे बांधकामच नव्हे, तर स्मारक परिसरातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि आजूबाजूच्या आवश्यक सोयी-सुविधांचा विकास केला जाणार आहे. त्यामुळे सिंदखेडराजाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी सुविधा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे.

स्थानिक नगरपालिकेकडून या विकासकामांसाठी प्रस्ताव मागविण्यात येणार असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध कामांना गती देण्यात येणार आहे. स्मारकाचे काम वेळेत पूर्ण करून सिंदखेडराजाला महत्त्वाचे ऐतिहासिक व पर्यटनस्थळ म्हणून अधिक विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

ऐतिहासिक वारशाला मिळणार नवी ओळख
राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मभूमीचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासोबतच या परिसराचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास करण्यासाठी स्मारक प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. अतिरिक्त ५० कोटींच्या निधीमुळे रखडलेल्या अथवा प्रलंबित कामांना गती मिळण्याची शक्यता असून, स्थानिक नागरिक आणि इतिहासप्रेमींमध्येही या निर्णयामुळे समाधान व्यक्त होत आहे.

या बैठकीस मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुनील भुसारा तसेच माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या स्मृती आणि ऐतिहासिक वारशाला साजेसे भव्य स्मारक उभारून सिंदखेडराजाच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्याचा शासनाचा प्रयत्न या निर्णयातून स्पष्ट होत आहे.

Grampanchayat/ग्रामसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; ग्रामसभेच्या सचिवपदाच्या कामकाजावर बहिष्काराचा निर्णय

 

गटविकास अधिकारी व तहसीलदारांना निवेदन; यावल तालुक्यात ग्रामसभांसाठी अन्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्याची मागणी

यावल (प्रतिनिधी : विकी वानखडे)

– ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत ग्रामसेवक व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, पारोळा तालुक्यातील शिवरे ग्रामपंचायतीतील ग्रामपंचायत अधिकारी ए.एन. पाटील यांच्या मृत्यूच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या यावल तालुका शाखेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्रामसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत ग्रामसभेच्या सचिवपदाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

यासंदर्भात यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच तहसीलदार यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. ग्रामसभांचे कामकाज सुरळीत राहावे, यासाठी ग्रामसेवकांऐवजी अन्य विभागातील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची ग्रामसभा सचिव म्हणून नियुक्ती करावी, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

संघटनेच्या निवेदनानुसार, पारोळा तालुक्यातील मौजे शिवरे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायत अधिकारी ए.एन. पाटील यांच्या घरात झालेल्या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत धक्कादायक असून, या घटनेचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.yavalnews

ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवक हे गावपातळीवर शासनाच्या विविध योजना, ग्रामसभा, विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी पार पाडत असतात. मात्र, कामकाज करताना त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

१८ ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी बहिष्कार

निवेदनात नमूद केल्यानुसार, दि. १८ ऑगस्ट २०२६ पासून पुढे अनिश्चित कालावधीकरिता ग्रामसभा घेण्याच्या कामकाजात ग्रामपंचायत सचिव म्हणून ग्रामसेवक उपस्थित राहणार नाहीत. ग्रामसभेच्या सचिवपदाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये आयोजित होणाऱ्या आगामी ग्रामसभांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामसभांचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.yavalnews

अन्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी

यावल तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या ग्रामसभांसाठी ग्रामपंचायत अधिकारी अथवा ग्रामसेवकांऐवजी अन्य विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत संबंधित विभागांना तातडीने योग्य त्या सूचना देण्यात याव्यात, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवक संघटना प्रशासनास सहकार्य करण्यास सदैव तयार आहे. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्याने त्यांच्या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.

प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

Garampanchayat/ग्रामसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न, ग्रामसभांचे कामकाज आणि पर्यायी सचिवांची नियुक्ती याबाबत आता गटविकास अधिकारी व तहसीलदार प्रशासन कोणती भूमिका घेतात, याकडे यावल तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. संघटनेच्या निर्णयामुळे आगामी ग्रामसभांचे कामकाज कोणत्या पद्धतीने पार पडणार, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

Policenews/अपिलीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दहेगाव पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही फुटेजचे निरीक्षण १८ ऑगस्ट रोजी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी; मोबाईल हिसकावणे व हातापाईचे दृश्य असल्याचा पत्रकार सचिन वाघे यांचा दावा

 

प्रतिनिधी : सचिन वाघे

हिंगणघाट/वर्धा : माहिती अधिकारातील अपिलीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दहेगाव गोसावी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजचे प्रत्यक्ष निरीक्षण १८ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या निरीक्षणादरम्यान संबंधित सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले. या निरीक्षणानंतर पत्रकार सचिन वाघे यांनी यापूर्वीच्या चौकशी अहवालावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.ceimenews

दहेगाव पोलीस ठाण्यात घडलेल्या कथित प्रकारासंदर्भात वाघे यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून सीसीटीव्ही फुटेजची माहिती व प्रत मिळविण्याची मागणी केली होती. माहिती अधिकारातील अपिलीय प्रक्रियेनंतर संबंधित फुटेजचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार १८ ऑगस्ट रोजी दहेगाव पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली.

फुटेजमध्ये मोबाईल हिसकावणे व हातापाईचे दृश्य असल्याचा दावा पत्रकार सचिन वाघे यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्ष सीसीटीव्ही फुटेज पाहताना पोलिसांकडून मोबाईल हिसकावण्यात येत असल्याचे तसेच हातापाई झाल्याचे दृश्य दिसून आले. या दृश्यांमुळे यापूर्वी करण्यात आलेल्या चौकशीतील निष्कर्ष आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा घटनाक्रम यामध्ये तफावत आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

वाघे यांच्या म्हणण्यानुसार, सीसीटीव्ही फुटेज हा या प्रकरणातील महत्त्वाचा इलेक्ट्रॉनिक पुरावा असून त्याचा संपूर्ण घटनाक्रमाच्या संदर्भात विचार होणे आवश्यक आहे.wardhanews

सीसीटीव्ही फुटेज न पाहता चौकशी अहवाल?
या प्रकरणात पोलीस उपविभागीय अधिकारी, वर्धा यांनी संबंधित सीसीटीव्ही फुटेजची प्रत्यक्ष पाहणी न करताच पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्याकडे चौकशी अहवाल सादर केल्याचा आरोप पत्रकार वाघे यांनी केला आहे.
जर चौकशी अधिकाऱ्यांनी संबंधित इलेक्ट्रॉनिक फुटेजची प्रत्यक्ष पाहणी केली नसेल, तर चौकशी अहवाल कोणत्या आधारावर तयार करण्यात आला, असा सवाल वाघे यांनी उपस्थित केला आहे.

त्यामुळे या प्रकरणाची फेरतपासणी करून नव्याने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
३१ जुलैच्या फेरतपासणी अर्जावर निर्णयाची प्रतीक्षा
पत्रकार सचिन वाघे यांनी ३१ जुलै २०२६ रोजी पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्याकडे फेरतपासणी व नव्याने चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, या अर्जावर अद्याप अंतिम निर्णय अथवा अधिकृत लेखी उत्तर मिळाले नसल्याचे वाघे यांनी सांगितले.hingnghatnews

सीसीटीव्ही फुटेजची प्रत्यक्ष पाहणी न करता चौकशी अहवाल सादर करण्यात आला असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दहेगाव पोलीस ठाण्यात १० सीसीटीव्ही कॅमेरे
दहेगाव गोसावी पोलीस ठाण्यात एकूण १० सीसीटीव्ही कॅमेरे असल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये पोलीस ठाण्याच्या आतील भागासह प्रवेशद्वारांच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.policenews

दरम्यान, पोलीस ठाण्याच्या मुख्य बाहेरील प्रवेशद्वारावर असलेला सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचे निरीक्षणादरम्यान सांगण्यात आले. या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा फोटो काढण्याची विनंती पत्रकार सचिन वाघे यांनी केली असता आनंद भस्मे यांनी फोटो काढू दिला नाही, असे वाघे यांनी सांगितले.

कॅमेरा बंद असल्याची माहिती निरीक्षणादरम्यान सांगण्यात आली असून, त्याबाबत स्वतंत्रपणे कोणतीही मागणी करण्यात आलेली नसल्याचे वाघे यांनी स्पष्ट केले आहे.

इलेक्ट्रॉनिक प्रमाणित प्रत देण्याची मागणी
अपिलीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सीसीटीव्ही फुटेजचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यात आले असले तरी संबंधित फुटेजची इलेक्ट्रॉनिक प्रमाणित प्रत मिळावी, अशी मागणी पत्रकार वाघे यांनी केली आहे.
केवळ फुटेजचे निरीक्षण करण्याऐवजी त्याची अधिकृत प्रमाणित इलेक्ट्रॉनिक प्रत उपलब्ध झाल्यास घटनाक्रमाची स्वतंत्रपणे पडताळणी करता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी नागपूर विभागीय माहिती आयुक्तांकडे पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांकडून पत्रकाराविरुद्ध कारवाई
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पत्रकार सचिन वाघे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात आलेला घटनाक्रम आणि त्यानंतर झालेली पोलीस कारवाई यांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे आवश्यक असल्याचे वाघे यांनी म्हटले आहे.
मोबाईल नेमका कोणत्या परिस्थितीत घेण्यात आला, हातापाई कशामुळे झाली आणि त्या वेळी उपस्थित असलेल्या व्यक्तींची नेमकी भूमिका काय होती, याचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
१८ ऑगस्टच्या निरीक्षणाच्या नोंदीकडे लक्ष
१८ ऑगस्ट रोजी झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या निरीक्षणानंतर आता त्याची अधिकृत नोंद काय केली जाते, निरीक्षणाचा अहवाल कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो आणि ३१ जुलैच्या फेरतपासणी अर्जावर पोलीस अधीक्षक, वर्धा कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

तसेच सीसीटीव्ही फुटेजची इलेक्ट्रॉनिक प्रमाणित प्रत देण्याच्या मागणीवर माहिती आयोग काय निर्णय घेतो, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

निष्पक्ष फेरचौकशीची मागणी सीसीटीव्ही फुटेज, त्यातील घटनाक्रम, यापूर्वीचा चौकशी अहवाल आणि ३१ जुलै रोजी सादर केलेला फेरतपासणी अर्ज या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून निष्पक्षपणे नव्याने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार सचिन वाघे यांनी केली आहे. breakfast

चौकशीत संबंधित अधिकाऱ्यांकडून नियमबाह्य अथवा चुकीची कार्यवाही झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणात कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Policenews/टीप :सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्ये, मोबाईल हिसकावणे व हातापाईबाबतचे दावे तसेच चौकशी अहवालासंदर्भातील आक्षेप हे पत्रकार सचिन वाघे यांनी केले आहेत. मुख्य बाहेरील प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याची माहिती निरीक्षणादरम्यान सांगण्यात आल्याचेही वाघे यांनी नमूद केले आहे. संबंधित पोलीस अधिकारी किंवा पोलीस विभागाची अधिकृत बाजू प्राप्त झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.policenews

Accident news/१५ ऑगस्टच्या आनंदमय वातावरणात हिंगणघाटला काळीज पिळवटून टाकणारी घटना; तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू

 

सूर्या मराठी NEWS
प्रतिनिधी सचिन वाघे

ब्रेकिंग न्यूज | हिंगणघाट स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी हिंगणघाट शहरात सर्वत्र देशभक्तीचा जल्लोष आणि आनंदाचे वातावरण असतानाच सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली.

आज सकाळी सुमारे ९.३० वाजता बिडकर कॉलेज ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजदरम्यान हंसा ट्रॅव्हल्स आणि ॲक्टिव्हाचा भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, ॲक्टिव्हावरून जाणाऱ्या तीन विद्यार्थिनी हंसा ट्रॅव्हल्सच्या मागील चाकाखाली आल्याने या दुर्घटनेत तिन्ही विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.hingnghat

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत विद्यार्थिनींपैकी एक विद्यार्थिनी मोहत कॉलेजची, तर दोन विद्यार्थिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये इयत्ता ११वीत शिक्षण घेत होत्या.brekingnews

Accident newsअपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली

Nanded news/ इंद्रजीतसिंग बावरी हत्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करा; आरोपींना कठोर शिक्षा द्या

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक )

परभणी : नांदेड येथील दूध डेअरी परिसरातील धनेगाव पेट्रोल पंपाजवळ माजी सैनिक बलजीतसिंग बावरी यांचा मुलगा इंद्रजीतसिंग बावरी यांच्या हत्येची घटना अत्यंत गंभीर असून, या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परभणीतील दशमेश पी. जी. गुरु गोविंदसिंहजी सेवाभावी संस्था यांच्या वतीने करण्यात आली आहे.indrajitsingbawari

यासंदर्भात संस्थेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी, परभणी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. ८ ऑगस्ट २०२६ रोजी नांदेडच्या दूध डेअरी परिसरातील धनेगाव पेट्रोल पंपावर इंद्रजीतसिंग बलजीतसिंग बावरी यांच्या हत्येची गंभीर घटना घडली, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे समाजात आक्रोश, भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

मृत इंद्रजीतसिंग बावरी यांच्या हत्येचे प्रकरण संवेदनशील असल्याने त्याची निष्पक्ष, स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक असल्याचे संस्थेने म्हटले आहे. नांदेड पोलिस विभागाच्या स्थानिक यंत्रणेऐवजी DIG दर्जाच्या वरिष्ठ व स्वतंत्र पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करून तपास करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.  Nandednews

निवेदनातील प्रमुख मागण्या

हत्येच्या प्रकरणात प्रत्यक्ष सहभागी आरोपी, मुख्य सूत्रधार, कटात सहभागी व्यक्ती, सहकारी तसेच हत्येसाठी शस्त्र उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.policenews

तसेच तपासासाठी संबंधित अधिकाऱ्याला FIR, CCTV फुटेज, कॉल रेकॉर्ड, तांत्रिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक अहवाल व इतर आवश्यक पुराव्यांची तपासणी करण्याचे पूर्ण अधिकार द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.sit

Nanded news/या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि दोष सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशीही मागणी संस्थेने केली आहे. तसेच परिसरातील सराईत गुन्हेगार व हिस्ट्रीशीटरांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

murdernews/ ४आरोपी पोलिसांच्या ताब्यात, मग कथित मास्टरमाईड कुठे? नांदेड हत्याकांडाने उपस्थित केले सवाल??

 

अनिलसिंग चव्हाण ( संपादक)

आतापर्यंत ४ आरोपी अटकेत; कथित मुख्य आरोपी नितीन बिलानिया अद्याप पोलिसांच्या हाती नाही!‘मास्टरमाइंड’ असल्याचा दावा; सिकलीगर समाजाचा पोलिसांवर पूर्ण विश्वास, मात्र मुख्य आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी

नांदेड येथे इंद्रजीतसिंग बावरी यांच्या हत्या प्रकरणाने सिकलीगर समाजात तीव्र संताप आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण केले आहे.

या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या प्रकरणातील कथित मुख्य आरोपी नितीन बिलानिया अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

मुख्य आरोपी नेमका कुठे?

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन बिलानिया याच्यावर या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कथित मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. Policenews

मात्र या आरोपांची अंतिम सत्यता तपासातून आणि न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार आहे.चार आरोपी अटकेत असताना कथित मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या कोसो दूर असल्याने, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कोणती पावले उचलली आहेत?, nandedmudernews

तो नेमका कुठे आहे?, तसेच त्याला अटक करण्यास विलंब का होत आहे?, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.mudernews

सिकलीगर समाजाचा पोलिसांवर पूर्ण विश्वास
या प्रकरणात सिकलीगर समाजाने पोलिस प्रशासनावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. पोलिसांनी निष्पक्ष आणि सखोल तपास करून या हत्येच्या घटनेमागील संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे, अशी समाजाची अपेक्षा आहे.

तसेच केवळ अटक केलेल्या आरोपींपर्यंत तपास मर्यादित न ठेवता, या प्रकरणामागे आणखी कोणी व्यक्ती सहभागी आहे का, कटाचा नेमका उद्देश काय होता आणि हत्येमागील संपूर्ण पार्श्वभूमी काय आहे, याचा तपास करण्याची मागणी होत आहे..indrajitsing bavr

‘मुख्य आरोपीला कधी अटक?’ हा सर्वात मोठा सवाल इंद्रजीतसिंग बावरी हत्या प्रकरणात चार आरोपी अटकेत असले तरी कथित मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याचा आरोप आहे.

त्यामुळे आता सर्वांचे लक्ष पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागले आहे. पोलिस मुख्य आरोपी नितीन बिलानियाला लवकरच ताब्यात घेणार का?त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी कोणते पुरावे आणि तपासाचे धागेदोरे हाती घेतले आहेत?

या हत्याकांडामागील खरा कट काय आहे?
या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिस तपासातून समोर येणे अपेक्षित आहे.

न्याय मिळण्याची समाजाची अपेक्षा
इंद्रजीतसिंग बावरी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणाचा तपास निष्पक्ष, पारदर्शक आणि कोणत्याही दबावाशिवाय व्हावा, अशी समाजाची भावना आहे.indrajitsing bavri murder nanded

सिकलीगर समाजाचा पोलिस प्रशासनावर विश्वास आहे; मात्र हा विश्वास कायम ठेवण्यासाठी कथित मुख्य आरोपीचा शोध घेऊन त्याला कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेणे आणि संपूर्ण प्रकरणाचा छडा लावणे महत्त्वाचे ठरणार आहे.indrajitsing bavri

Abhaysingh Marode/अभयसिंह मारोडे यांची राष्ट्रीय नेतृत्व विकास कार्यक्रमासाठी निवड.

 

संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील रहिवासी, कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूरचे विद्यमान संचालक तथा पळशी झाशीचे माजी सरपंच अभयसिंह मनोहर मारोडे यांची इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रसी (ISD) आयोजित ‘द गुड पॉलिटिशियन २०२६’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. देशभरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात तळागाळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या हजारो अर्जदारांमधून निवडलेल्या अवघ्या ५० युवा नेत्यांमध्ये त्यांचा समावेश झाला असून, यावर्षी संपूर्ण विदर्भातून निवड होणारे ते एकमेव युवा नेतृत्व ठरले आहेत.

 

 

ही निवड प्रक्रिया जवळपास तीन महिन्यांपर्यंत चालली. यात ऑनलाइन लेख सादरीकरण, व्हिडिओ मुलाखत आणि दोन दिवसीय निवासी बूट कॅम्प अशा विविध टप्प्यांचा समावेश होता. या सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी कामगिरी केल्यानंतर अंतिम ५० जणांची निवड करण्यात आली.

या नऊ महिन्यांच्या निवासी नेतृत्व विकास कार्यक्रमामध्ये सहभागी युवा नेत्यांना लोकशाही व्यवस्था, संविधानिक मूल्ये, सार्वजनिक धोरणे, निवडणूक प्रक्रिया, प्रभावी नेतृत्व, जनसंवाद, संघटन उभारणी, निवडणूक नियोजन, धोरणनिर्मिती तसेच लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय देशातील विविध राज्यांतील सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत युवा नेतृत्वाशी संवाद, अनुभवांची देवाणघेवाण आणि परस्परांकडून शिकण्याची संधीही या कार्यक्रमातून मिळणार आहे.

अभयसिंह मारोडे हे यापूर्वी संभाजी ब्रिगेडचे माजी प्रवक्ते म्हणून कार्यरत होते. सध्या ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असून, मानवता, समता, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये, युवकांचे संघटन, शिक्षण तसेच वंचित, उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांवर अनेक वर्षांपासून सातत्याने कार्य करत आहेत. त्यांच्या या सामाजिक व लोकशाहीवादी कार्याची दखल घेत इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रसीने त्यांची राष्ट्रीय नेतृत्व विकास कार्यक्रमासाठी निवड केली आहे.

Abhaysingmarode/अभयसिंह मारोडे यांची ही निवड संग्रामपूर तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Gharkulyojna/घरकुल योजनेतील अनियमिततेविरोधात डॉ बच्छिरे यांचा एल्गार

 

घरकुल योजनेतील अनियमिततेविरोधात शिवसेना उ.बा.ठा. आक्रमक; १५ दिवसांत माहिती न दिल्यास लोणार नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा जिल्हा संघटक डॉ. गोपालसिंह बछिरे यांनी दिला

​लोणार:नगरपरिषद हद्दीमध्ये रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत झालेल्या कामांमध्ये पारदर्शकता राहावी आणि लाभार्थ्यांना मिळालेल्या अनुदानाची सविस्तर माहिती समोर यावी, यासाठी शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या वतीने लोणार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना कडक इशारा देणारे निवेदन सादर करण्यात आले.

All Sikh sikhaligar/ ऑल सिख-सिकलीगर असोसिएशन (आसा)ची महाराष्ट्र स्तरीय बैठक बडनेरा येथे उत्साहात संपन्न

​निवेदनात नमूद केल्यानुसार, सन २०२१ ते सन २०२५ या कालावधीत रमाई आवास योजना आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सर्व घरकुलांची सविस्तर व साक्षांकित (Attested) माहिती मागवण्यात आली आहे. यामध्ये सर्व घरकुलधारकांचे स्थळ निरीक्षण अहवाल त्यासोबत जोडलेली छायाचित्रे, लाभार्थ्यांनी सादर केलेली कागदपत्रे आणि आजपर्यंत कोणत्या लाभार्थ्याला किती अनुदान मिळाले, याच्या धनादेशाच्या तारखांसह संपूर्ण माहितीचा समावेश आहे.panchayatsamiti

​पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, येत्या १५ दिवसांच्या आत ही सर्व माहिती साक्षांकित करून नगरपरिषदेने उपलब्ध करून द्यावी. ठरलेल्या मुदतीत माहिती न मिळाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने लोणार नगरपरिषदेच्या प्रांगणात तीव्र ठिय्या आंदोलन छेडले जाईल. एवढेच नव्हे तर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना मुख्य द्वारातून आत प्रवेश करू दिला जाणार नाही, असा थेट इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.lonarnews

Gharkulyojna/​या निवेदनावर जिल्हा संघटक डॉ. गोपालसिंह बछिरे, शहर प्रमुख गजानन जाधव सर, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे सर, युवा शहराधिकारी श्रीकांत मादनकर, शहर संघटक तानाजी मापारी, विभाग प्रमुख तानाजी आंभोरे, इक्बाल कुरेशी, अश्पाक खान, योगेश भूक्कन, गोपाल मापारी, शे. सादेक शे. जमीर, शेख इक्बाल, ओवेस कुरेशी, ज्ञानेश्वर दुधामोगरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. नगरपरिषद प्रशासन आता यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.